पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा   

देहू संस्थानची आयुक्तांकडे मागणी

पिंपरी : जगद्गुरू संत तुकाराम महाराज ३४०व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे येत्या १८ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी नुकतीच श्रीक्षेत्र देहूगाव येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी देहू देवस्थानचे अध्यक्ष विश्वस्त यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. महापालिका हद्दीत वारीनिमित्त भक्ती-शक्ती येथून पालखी सोहळा आकुर्डीकडे मुक्कामी जात असताना पालखी सोहळा एका बाजूने, तर काही वारकरी भाविकभक्त दुसर्या बाजूने चालत जात असतात. त्यांना कुठे अडचण होऊ नये, यासाठी मेट्रोचे सुरू असलेले काम आठ दिवस बंद ठेवावे, अशी मागणी केली आहे.
 
संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यादिवशी महाद्वारातून ३९५ दिंड्यांना प्रवेश द्यावा. या दिंड्या वारकरी भाविक भक्त प्रदक्षिणा घालून नारायण महाराज समाधीकडील दरवाजावाटे बाहेर पडतील. यावेळी भाविकांना दर्शन घेता यावे, यासाठी दर्शनबारीतून मुखदर्शन घेता येईल, अशी व्यवस्था करावी. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाल्यानंतर हा पालखी सोहळा पहिल्या मुक्कामासाठी इनामदार साहेब वाड्यात येत असतो. या इनामदारसाहेब वाड्याचे प्रवेशद्वार अतिशय लहान आकाराचे आहे. याठिकाणी भाविकभक्तांची गर्दी होत असते. या गर्दीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
 
परंपरेनुसार पालखी सोहळा इनामदारसाहेब वाडा येथून निघाल्यानंतर पहिल्या समाज आरतीसाठी अनगडशाहबाबा दर्गा या ठिकाणी थांबत असतो. त्यामुळे याठिकाणी दर्शनासाठी स्थानिक ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी पोलिस प्रशासनाने घ्यावी. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दुपारी समाज आरतीसाठी व दुपारच्या विश्रांतीसाठी विसावत असतो. मात्र याठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहने लावली जातात. त्यावर नियंत्रण ठेवून हा परिसर मोकळा कसा राहील, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
 
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इनामदारसाहेब वाड्यातून १९ जून रोजी सकाळी लाखो वारकरी भाविकभक्तांच्या उपस्थितीत मार्गस्थ होणार आहे. यादिवशी निगडी ते देहूरोड आणि देहूरोड ते देहू या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवावी. जेणेकरून वारकरी भाविकभक्तांना पायी प्रवास करताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. अशा प्रकारे देहू देवस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त व पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यात चर्चा होऊन विश्वस्तांनी वरील मागण्या केल्या. यावर सर्व सूचनांचे पालन करून उपाययोजना करण्यात येतील, असे चौबे यांनी सांगितले. या बैठकीस महापालिका आयुक्त शेखर सिंह, संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख दिलीप महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, गणेश महाराज मोरे आदी उपस्थित होते.

पासधारक वाहनांनाच प्रवेश द्यावा

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या दिंड्यांसोबत त्यांची वाहने असतात. ज्यात त्यांचे अन्नधान्य, स्वयंपाकाचे साहित्य असते. स्वयंपाक करणारे कर्मचारी असतात. अशा वाहनांना पास देण्यात आलेले आहेत. हे पास दाखवल्यानंतरच अशा वाहनांना अडवून न ठेवता तत्काळ प्रवेश द्यावा, अशी मागणी संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.
 

Related Articles